Thursday, 18 May 2023

एक ट्रेक - गाडग्या आणि कुड्या डोंगराचा

 सह्याद्रीत भटकंती करताना...

सह्याद्रीत भटकंती करताना अचानक काहीतरी असे सह्याद्रीचे वेगेळे रूप अनुभवायला मिळते की आपण ते आयुष्यभर विसरू शकत नाही... असाच हा माझा छोटासा ट्रेक जो माझ्या नेहमी स्मरणात राहील... 

जगबुडी धरणावरून दिसणारे डोंगर

 कोठेही रस्त्याने एखादा डोंगर आगळा-वेगळा दिसला की लगेच गाडी उभी करून फोटो काढणे नाहीतर गाडी पार्क करून ट्रेक चालू करणे हा जणू काही माझा छंदच... डोंगराचे नाव माहित नाही की त्याचे वेगळे पण... असाच एक सुंदर ट्रेक नुकताच मी अनुभवला... डूबेरे ते ठांणगाव रस्त्याला लागून आणि डूबेरेवाडीपासुन ३ किमी अंतरावर एक सुंदर जोड-डोंगर आहे... गाडग्या डोंगर आणि कुडा डोंगर... हे सुदंर डोंगर मनात भरले ते दुरून दिसणाऱ्या डोंगरातील कपारी/गुहेमुळे... नेहमी माझ्या गावाकडे जाताना या डोंगरावरील गुहा माझ लक्ष वेधून घेत असत... या वेळी इथे जाण्याच्या निश्चय केला... मग काय पायथ्याशी असलेल्या घरापुढे गाडी उभी करून डोंगराच्या दिशेने निघालो... सकाळचे १० वाजले असावेत... रस्ता माहित नाही, कसं जायचं माहीत नाही, काय बघायला मिळेल माहित नाही... बरोबर ट्रेकची बॅग त्यात ४० फुटाचा रोप, पाणी, आणि थोडाफार सुखा खावू, हे नेहमीच बरोबर ठेवतो...

पायथ्या पासून दिसणारा गाडग्या डोंगर

१५ मिनिटे चालत गेल्यावर धोतर घातलेले साठ-पासष्ट वयाचे बाबा ६-७ गाई घेवुन जाताना दिसले... डोंगराची माहित काढण्याचा प्रयत्न केला... "गाडग्या आणि कुड्या म्हणतात या डोंगरांना..." कुड्या डोंगराच्या दुरून दिसणाऱ्या गुहेचा रस्ता त्यानी मला सांगितला... माझी विचारपूस केली. मी_नाशिकला चालो होतो डोंगराच्या एका बाजुला गुहा दिसतात त्या बघण्यासाठी निघालो आहे. वेळ आहे तर फिरून येतो. "इकडे बिबटे असतात का बाबा" मी सहजच विचारले. बाबा म्हणे_ " ५ - ६ बिबटे आहेत या भागात. पण माणसाला काही नाही करत. शेळ्यावाले जातात शेळ्या घेवून तिकडे कुड्याच्या पोटाने." 

डोंगर पाय वाट विचारून घेतली आणि सांगितलेली वाटेने निघालो. गाडग्या डोंगराच्या उंच कड्याखालुन वळसा घालुन पुढे दोन्ही डोंगरांच्या खिंडी मध्ये वाट येते. डोंगराला वळसा घालताना डोंगराचे मोठे कडे तुटुन खाली मोठे दगड पसरलेले दिसतात. त्यातूनच पाय वाटेने पुढे खिंडीत येतो. येथूनच काही अंतरावरच गुहा दिसतात. पुढे जाताना मनात बिबट्या असण्याची शक्यता येऊन गेली.. 


दोन्हीं डोंगरांच्या खिंडीत पोहोचलो. गाडग्या डोंगर मागे टाकत कुड्याच्या गुहेकडे निघालो... जाताना कानोसा घेत होतो काही आवाज येतो का... आवाज केला आणि गुहेत लांबूनच डोकावून पाहिलं तर कोणी नव्हत... मोठी नैसर्गिक आणि सुंदर गुहा... इथे कधी पावसाचं पाणी आत येत नाही म्हणुन शेळ्या जनावरे यांची विश्रांतीसाठी वापार होत असावा... जनावरांच्या मलमुत्राचा वास गुहेत पसरलेला... एक चुल पण मांडून ठेवलेली आहे... 

नैसर्गिक गुफा - कुडा डोंगर 

दगडी चौथऱ्यावर बसुन गुहेच निरीक्षण करत बॅगेतील पाणी बॉटल काढून दोन घोट पाणी प्यालो... गुहेतील काही फोटो आणि बाहेर दिसणाऱ्या निसर्गाला मोबाईल मध्ये टिपत होतो... तेच शेळ्यांचा आवाज आला... 

शेळ्या घेऊन एक पन्नाशीचा माणूस येताना दिसला... बाबा इकडे रोज येता का मी मुद्दाम गप्पांना सुरुवात केली... तुमचे नाव काय कुठे राहता मी विचारलं... बाबा म्हणाले - मी कारभारी जडगुले येथे खाली डुबेरवाडी जवळ राहतो आणि रोज इकडे शेळ्या घेऊन येतो... दोन्ही डोंगराबद्दल बाबा ला विचारले असता बाबा म्हणाले- कुडा/ कुड्या डोंगराच्या गुहेत आम्ही नेहमी विश्रांतीला थांबतो.. इथ तीन रंगाचे दगड, माती पाहायला मिळते... पश्चिमेला हात करत बाबांनी सांगितल की "ईकडे चालत गेलं दोन डोंगर ओलांडले की आडवाडी येते. या खालच्या नळीत आणि कड्याला बिबटे असतात. परवा एक बकरू बिबट्याने पळवल आणि काही दिवसापूर्वी कड्यावरून शेळी खाली फेकली. आणि त्या नळीत कपारीत खाली त्यांची जागा आहे." बाबाने हातात असलेल्या घुंगराच्या काठीने मला बिबट्याची असण्याची जागा दाखवली. पण बिबट्या माणसावर चाल नाही करत ऐकल्यावर थोड बर वाटलं.

" कुड्या डोंगराला लागुन ह्या गुहा निवाऱ्याठी चांगल्या आहेत डोंगर माथ्यावर बघायला काही नाही पण त्या गाडग्यावर जा तिकडे वर हौद आहेत." काय सांगता पाण्याची टाके आहेत वर? मी आश्चर्याने विचारले... बाबा म्हणाले _ "हा पण गाडग्यावर जायला आवघड आहे... दोन वाटा आहेत पण चढायला जमल पाहिजे.. गावाच्या कडून (उत्तर दिशेने) सोप आहे पण आट दहा फुटाचा कडा आहे आणि पश्चिमेकडू २५-३० फुटाचा अवघड कडा चढुन जावं लागतं... नवीन माणसाला नाही जमणार... आमच्या गावातले पोर जातात वरती." बाबा पुढे निघाले आणि मी त्यांचा निरोप घेत गाडग्या डोंगराच्या दिशेने निघालो... पुन्हा खिंडीत पोहोचलो... आता या खिंडीतुन दोन वाटा आहेत एक डोंगराला वळसा घालुन उत्तरे कडून वर चढणे आणि दुसरी वाट खिंडीतूनच वरती २५ ते ३० फूट वरती कड्यावर चढुण जाणे... कुड्या डोंगराकडे थोड वरती चढुन गाडग्या डोंगराच्या कड्याचा अंदाज घेतला... गाडग्या डोंगराचे काही फोटो घेतले... आणखी थोडे वर जावून कडा चढायला किती अवघड आहे बघितल...  

खिंडीतून  गाडग्या डोंगरावर जाण्याचा मार्ग

आजवरच्या अरोहणाच्या मोहिमा बघता सहजच वरती जाऊ असे मनात आले आणि सुरु केली चढाई... तसा बॅगेत 30 फुटाचा रोप होता बरोबर... उतरतांना त्याचा आधार होणार होता... जवळपास ३० फुट वरती गेलो आणि सपाट भाग लागला... तेथेच तीन एका रांगेत ठेवलेले दगड दिसले इथे आधी बुरुंज असेल असे भासवत होते... 

गाडग्या डोंगरावरून दिसणारा परिसर










 २५ फूट चालत गेल्यावर पहिले पाण्याचे टाके दिसले आणि पुढे आणखी एक टाके... बघताच खुप आनंद झाला... आजचा अचानक ठरलेला ट्रेक असा सुंदर असेल असे वाटले नव्हते... एक टाके चौरसा कृती १४ X १४ फुटाचे आणि ४ फुटा पर्यन्त खोली असावी... आणि दुसरे टाके काही प्रमाणात तुटलेले अर्धवट कोरलेले होते... पण पाण्यामुळे त्याची खोली आणि आकार अंदाज नाही करता आला.. आयता कृती आकार पण खोली काही लक्षात आली नाही... दोन्ही टाक्यांच्या कडेने गोल खड्डे आहेत... त्यात लाकडे रोवत असावीत... उत्तर दिशेकडे वाट आहे तर ती शोधण्याचा प्रयत्न केला... एका ठिकाणी तीन कोरीव पायऱ्या दिसल्या... लक्षात आले की हीच ती दुसरी वाट असेल... या डोंगरावरून सभोवतालचा परिसर खुप सुंदर दिसतो... डोंगरावर मोठी झाडे नाहीत... साबराची झुडपे सर्वत्र पहायला मिळतात. कड्याला लागून दोन पिंपळाची झाडे आहे.




 पश्चिमेकडे आडगड उत्तरेस डुबेरगड आणि पूर्वेस सोनगड, पर्वतगड दिसतात. पूर्वेकडे कौल्या नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरावर रिव्हर्स धबधबा बघण्यास मिळतो.. गाडग्या डोंगर टेहळणी साठी वापरात असावा आणि याचे स्थान महत्वाचे असेल. डूबेरगड, सिन्नर, आडगड आणि ठांणगाव यांच्या वाटेवर लक्ष ठेवणे येथुन सहज शक्य आहे.

 तब्बल दोन तास उलटले होते हि भटकंती सुरू होऊन. आता गाडग्या डोंगर कडा उतरून खाली जाण्याचा प्रश्न होता. वरती आलो त्या वाटेने उतरण अवघड होत. मग दुसरा मार्ग शोधत हळू हळू खाली उतरत होतो. आता छोटा अवघड पॅच सात-आठ फुटाचा असेल. तिथे सुरक्षेसाठी रोप झाडाला यु केला आणि हळू उतरुन आलो.

 तेथे पुर्वी पायरी मार्ग असवा पण कडा तुटल्याने तेथे रस्ता बंद झाला असेल. सहसा या डोंगरावर कोणी जात नाही हेच कारण असेल. तेव्हढा कडा सोडला तर डोंगर चढने उतरणे अवघड नाही. या डोंगराचा आकार एका मडक्या सारखा/ गाडग्या सारखा गोलाकार आहे म्हणुन याला गाडग्या म्हणत असावेत...  डूबेरे गावापासून ३ किमी अंतरावर असलेला हा डोंगर गड असल्यास गिरी दुर्ग प्रकारातील किल्ला असावा की जेथून डूबेरगड, आडगड, पर्वतगड, सोनगड, सिन्नर यावर दृष्टिक्षेप टाकता येतो. तसेच ईतिहास काळात हा टेहळणी दुर्ग असण्याची दाट शक्यता आहे. डोंगराचा तसा काही ईतिहास वाचण्यात नाही. हा दुर्लक्षित गाडग्या डोंगर गाडग्यागड म्हणुन नाशिकच्या गडकिल्ल्यांच्या यादीत का असु नये असं सहजच मनात येवून गेले. या डोंगराचा ईतिहास कोणाकडे असेल तर नक्की कळवा.

असा हा सुंदर ट्रेक आणि आनंदी क्षण डोळ्यात मनात साठवुन नागमोडी वळणं पार करत झुडपातून पायथ्याशी आलो... दुपारचे साडे बारा वाजले... मग एकदा दोन्हीं डोंगराला डोळ्यात साठवून नाशिकच्या दिशेने निघालो...

स्थान आणि क्षेत्रफळ:

गाडग्या - अक्षांश: १९.७५१०१ आणि रेखांश: ७३.९६३११

क्ष- ६२३० चौ. मी.

कुड्या - अक्षांश: १९.७५०१८ आणि रेखांश: ७३.९६०६४

क्ष- ३२३०० चौ. मी.

पायथ्याचे गाव: डूबेरवाडी (कृष्णनगर)

शिवार: डूबेरवाडी, तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक.

डूबेरगड ते गाडग्या डोंगर अंतर: ६ कि मी

आडगड ते गाडग्या डोंगर अंतर: ७ कि मी

🚶ट्रेक लेखन ✍️- भिमाशंकर सहाणे (३० जुलै २०२२)

मो. ९०९६९६५५९८

एक ट्रेक - गाडग्या आणि कुड्या डोंगराचा

सिन्नर बायपास हायवे वरून दिसणारा गाडग्या आणि कुड्या डोंगर 


Sunday, 12 May 2019


हेमाडपंथी जगदंबा मंदिर : टाहाकारी, अकोले


पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. 

राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर पाहन्यासारखे आहे. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.


सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.

 अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

आढळा नदीवरील टाहाकारी मंदिर तीन पांढरे कळस असलेले आणि मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात.

टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.

मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.

मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.

मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.

मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे - टाकेद गाव - टाहाकारी
२) नाशिक सिन्नर- ठाणगांव - टाहाकारी
३) नाशिक सिन्नर - डुबेर - पाडळी - समशेरपुर फाटा - टाहाकारी

✍️ भिमाशंकर सहाणे - नाशिक ट्रेकर्स





Sunday, 21 April 2019

कावनाई कपिलधारा तीर्थ क्षेत्र

कवनाई तीर्थ क्षेत्र -


एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचेही मानले जाते. तर या स्थानाला चिनी प्रवासी ह्युएनत्संगचाही सहवास लाभला आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. येथील परिसरात गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. कावनईचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे कपिलधारा तीर्थ व कामाक्षी मंदिर. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्‌मध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असल्याचे म्हटले जाते. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे. कावनईच्या राम मंदिरात ह्युएनत्संग (ह्यु-एन-त्संग) या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा आहे. ह्युएनत्संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५ च्या दरम्यान कावनईला भेट दिली होती. 
कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन –१. कांचीपुरा, २.गुवाहाटी व ३.करंजगाव (शेगाव).
कावनाई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्‍या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.
भविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.
कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.
श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्‍या त्‍या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्‍यात चार-पाच व्‍यक्‍ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. या पवित्र तीर्थास एक भेट... ✍️ भिमाशंकर सहाणे...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2313363255395002&id=100001640504883

Thursday, 24 January 2019

मोहनदर किल्ला - मोहनदरी ट्रेक (नेढ)



मोहनदरी ट्रेक -एक अविस्मरणीय ट्रेक

किल्ल्याचा प्रकार : 
गिरीदुर्ग




डोंगररांग: 
सातमाळ
जिल्हा : नाशिकश्रेणी : कठीण

मोहनदर किल्ला
पहाटे 4 वाजता जाण्याचे ठरले. मोहनदरी ट्रेक सर्वांसाठी नवीन. दुपारी परतीचे नियोजना मुळे ट्रेक पूर्ण करून परत नाशिक गाठायचे होते. 
पहाटे साडे चार वाजता मित्राच्या गाडीतून आम्ही आठ जन मोहनदरी कडे निघालो.
 मोहनदर किल्ला हा सप्तश्रृंगी देवीला जाताना एक गोल बोगदा असणारा डोंगर! मोहनदरी गावात गेल्यावर गाडी पार्क केली आणि डोंगर चढायला सुरुवात केली. चंद्राच्या प्रकाशात गोल नेढ़ दिसत होती. साडे पाच झाले असावेत. रस्ता माहित नव्हता. पण गावतुन पाय वाट एकाने दाखवून दिली. सर्वांकडे टोर्च होत्या. वाट शोधत, चुकत शिकत डोंगराच्या मध्यावर गेलो. रस्ता तसा अवघड होता. पण काही झाले तरी सुर्योदय वरतून बघायचे होते. आम्ही एक तासत नेढे पर्येन्त गेलो.
 मोठ्या हिमतीने आम्ही 10 ते 15 फुट कडा चढून गोल नेढयात पोहचलो. तेथुन दिसनारा निसर्ग मनमोहक आणि अविस्मरणीय होता. खुप सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. खुप सारे फोटो काढले. सर्व जन या सुंदर सूर्योदय आणि गोल नेढे बघुन तृप्त झाले. मनमुराद फोटो काढून झाल्यावर बरोबर आनलेले डबे खायला घेतले. एवढ्या उंचीवर जेवनाची मजा काही निराळीच! हे अद्भुत सौन्दर्य डोळ्यात साठवून आता परतीचा मार्ग पकड़ायचा होता. एक मेकाला साथ देत खाली उतरलो. पुन्हा गाड़ीत गप्पा गोष्टी करत नाशिकला आलो.

हा ट्रेक अनुभव खुप सुन्दर होता तसा तो अविस्मरणीय राहील कारण कोणत्याही रोप शिवाय आम्ही तो कडा (नेढ) चढून गेलो होतो. हा ट्रेक करताना प्रस्ताररोहनाचे साहित्य जवळ असुद्या. कोणताही ट्रेक करताना सुरक्षितता खुप महत्वाची!

मोहनदरी किल्लायाबद्दल थोडक्यात:
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो.

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडले. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.

मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहण करून १२ ते १५ फ़ुट चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी जातात.
गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.

गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते.

मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग:

मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.




-भिमाशंकर सहणे, नाशिक ट्रेकर्स

Sunday, 25 November 2018


"Kolaba Fort"


"किल्ले कुलाबा , मराठ्यांची सागरी राजधानी !"


          कुलाबा किल्ला बघायचे असे काही पूर्व नियोजन नव्हते... खरेतर आम्ही अचानक मुरुड जंजीर बघायाचा आणि अलिबाग किंवा काशीद बीच असे नियोजन. पण वेळे अभावी मुरुड जंजीरा न करता अलिबाग बीच आणि नागांव बीच करायचे ठरले तेही अलिबागला गेल्यावर.
           शनिवारी रात्री मित्राचा कॉल अला कि असे नियोजन आहे चल. मी दहा मिनिटात तयार झालो. बॅग हि नाही घेतली कारण लगेच परत यायचे होते. नाशिकहुन रात्री 12:30 वाजता निघालो. आम्ही चौघे मित्र मी, आशिष, आदित्य आणि विलास सर्व नाशिकचे कारने प्रवास आणि दोघांना गाडी चालवता येत होती त्यामुळे परत येणे शक्य होते पण पनवेलच्या पुढे रस्ता दुर्दशेत. त्यामुळे ट्रेक अटोपता घ्यावा लागला. नेहमी प्रमाणे गूगल map ने खुप मदत केली. अलिबाग बीचला पोहचलो तेंव्हा सकाळचे सात वाजले होते. एका हॉटेलमधे जेवण केले होते. अलिबाग चा नेहमी प्रमाणे गजबजलेला बीच सकाळी मात्र मोकळा होता. एक तास तेथे घालवला. तेथुन पुढचे नियोजन नागांव बीच पण जाताना आम्हाला एक किल्ला दिसला विचारले असता कळले कि तो कुलाबा किल्ला आहे. मग कुलाबा आणि मग नागांव बीच असे नियोजन ठरले.
            अर्ध्या तासात कुलाबा बीच वर पोहचलो. गाडी पार्क केली आणि तेथे एका छोट्या होटलमधे नाश्ता केला. बीचवरुन 200 रु. टिकेट काढले आणि बोटिने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्याहुन १ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याहुन ओहोटी वेळेस किल्ल्यात चालत जाता येते तर भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते.येथे किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाचे 25 रु. तिकीट घ्यावे लागते.

कुलाबा किल्ला:
              मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला उभा आहे. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला दिसून येतो. कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आला तो सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात. नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरविलेल्या कान्होजीं आंग्रेनी आपले प्रमुख ठाणे म्हणून कुलाबा किल्ल्याची निवड केली. प्रथम शिवशाही नंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
               दक्षिणोत्तर पसरलेला हा लांबट चौकोनी आकाराचा हा जलदुर्ग ज्या खडकावर उभा आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी ९०० फूट असून पूर्व पश्चिम रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३३५ वर्षे उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे.

 कुलाबा किल्ल्याला पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने अशी दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात तरीही मुख्य प्रवेशव्दारापासून सुमारे १५ फूटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर खाचा मारून रचलेले आहेत. दोन दगडांतील फटीत चुना भरलेला नसल्याने समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेचा जोर कमी होतो. किनाऱ्याहुन येताना किल्ल्याचा मुख्य दरवाजा सरळ समोर दिसत नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजुस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. थोडे उजव्या हाताला वळल्यावर दोन मोठया बुरुजांच्या मध्ये त्याचे दर्शन होते. दोन बुरुजांच्या मधोमधील महाद्वारावर नगारखाना असुन या दरवाज्यावर मोर, हत्ती, हरिण, शरभ आदी पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय उमलत्या कमळांची अनेक फुले कोरलेली असुन कमानीच्या मध्यभागी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. आत शिरताच वळण घेत पुढे आणखी एक दरवाजा आहे. हा किल्ल्याचा दरवाज्यातील रणमंडळाचा भाग आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा केवळ अवशेष रुपात शिल्लक असुन या दरवाजातून आंत जाताना कोनाड्यातील देवतांचे दर्शन होते.

किल्ल्याला एकुण १७ बुरुज असुन चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे त्यांची रचना आहे. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी,फत्तेबुरुज, दर्याबुरुज अशी नावे आहेत. शिरल्यावर उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते.

गडात शिरल्यावर समोर गुलवती देवीची घुमटी तर तटाकडे गडदेवता भवानीदेवी मंदिर दिसते. गडदेवता भवानी देवीच्या मंदिरात गणेश आणि वेताळ यांच्याही मुर्ती आहेत. देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभ आहे. लागुनच दहाबारा घरांची वस्ती आहे. या तटाच्या वर बुरूजावर दोन मध्यम आकाराच्या तोफा मातीत पडल्या आहेत. येथुन खाली उतरून आल्यावाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.
              देवीच्या मंदिरांपासुन सरळ निघालेल्या या वाटेत एक सिध्दीविनायक मंदिर आहे. छोटयाशा दगडी तटाच्या आत हे मंदिर असुन मंदिराच्या आवारात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा समोर एक अतिशय बारीक नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. साधारण वीस मीटर लांब, सहा मीटर रुंद व पंधरा मीटर उंच अशा ह्या मंदिराचे निर्माण राघोजी आंग्रेने सन १७५९ मध्ये केले. मुख्य मंदिर हेमाडपंती असुन मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले भग्न झालेले कारंजे आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची दीडफुट उंच मुर्तीची स्थापना केलेली आहे.

              मंदीरा बाहेर काळ्या दगडातील जुनी बांधकामातील नक्षीदार २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिरासमोरच एक चिरेबंदी बांधणीची गोडया पाण्याची देखणी पुष्कर्णी आहे. ३४.५ मीटर लांब आणि ३१.५ मीटर रुंद अशा विस्तीर्ण आकारातील हा तलाव राघोजी आंग्य्रांनीच बांधला. भिंतीला लागुनच बापदेवाची घुमटी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटाबाहेर स्वच्छ पाण्याची विहीर असुन या विहिरीला आत उतरायला पायऱ्या आहेत. याशिवाय गडातील पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता दक्षिणेकडे अंधारबाव नावाची आणखी एक विहीर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर ओंजळीने या विहिरीचे पाणी पिता येते.
 उत्तर बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ डाऊसन हार्डीफिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर इंग्लंड, १८४९असे तोफा बनवणाऱ्या कंपनीच नाव व वर्ष कोरलेल आहे. उत्तरेकडील या बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्लादर्शन होते तर पूर्वेला सागरगड व कणकेश्वर डोंगर दिसतो.दक्षिणेकडे कोर्लई किल्लाही दिसतो. मुख्य प्रवेशदार व विनायकाचे मंदिर ह्यामधे कान्होजी आंग्य्रांच्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात.
             सन १८१६मधे नानीसाहेबाचा वाडा नावाची पाच मजली इमारत राघोजी आंग्रे यांनी नव्याने बांधली आणि राहती केला. पण थोडय़ाच वर्षांत १८३९ मध्ये आंग्य्रांचे हे संस्थान इंग्रजांकडून खालसा झाले. त्यांचा अंमल आल्यावर त्यांनी सन १८४२ मधे या वाडय़ाच्या लाकडांचा लिलाव केला आणि इथले दगड वापरुन अलिबागच्या पाणी पुरवठा विभागाची इमारत बांधली. कुलाबा हे नाव 'कुल' आणि 'आप' या शब्दांपासून तयार झाले. कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी ! सर्व (बाजूने) पाणी असलेली ही जागा म्हणजे 'कुलाप'! याचाच अपभ्रंश तो कुलाबा ! इतिहासकाराच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले अशी माहिती मिळते म्हणजेच छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग! अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटर आत असलेल्या खडकावर १२ मार्च १६८० ते जुन १६८१पर्यंत भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याची येथे चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र ह्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर नवीन किल्ले बांधले व जुने अधिक बळकट केले. २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले.

          महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीस आला. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून त्यांनी आपले आरमार कुलाबा किल्ल्यावर हलवले आणि हा किल्ला आरमारी डावपेचांचा केंद्र बनला. जंजिऱ्याच्या सिद्दीने अनेक वेळा कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला पण प्रत्येक वेळी त्याला पराभव झाला. या किल्ल्याजवळ समुद्र खडकाळ व उथळ असून बंदरांत येण्याचा मार्ग अरुंद व सांपडण्यास कठिण असल्यामुळे आंग्र्यांचे आरमार या बंदरांत सुरक्षित असे. डच,इंग्रज, पोर्तुगीज आणि मुरुडचा सिद्दी या परकीय संकटांना आंग्य्रांच्या या अभेद्य भिंतीने रोखून धरले.

            कुलाबकर आंग्य्रांच्या पाच पिढय़ा इथे नांदल्या. त्यामुळे कुलाब्याच्या साऱ्या इतिहासावर आंग्रे घराण्याची छाप पडलेली आहे. ४ जुलै १७२९रोजी सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यात निधन झाले. त्यांची समाधी आजही आपल्याला अलिबाग मधील ठुकराली नाका येथे बघायला मिळते. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. कान्होजी आंग्रे यांनी योग्य रणनीती आखुन बाजीराव पेशव्यांच्या सहाय्याने या संयुक्त फौजेचा पराभव केला.
              असा हा सुंदर इतिहास असलेला कुलाबा किल्ला अलिबागला गेल्यावर नक्की बघा.
              वेळे अभावी आम्ही किल्ल्यातुन लवकरच निघालो. पुढे नागांव बीचला जावुन बोट राइडिंग केले. बनाना राइडिंग करताना तर तर बोट पाण्यात पलटी करायची तरच पैसे देवु असे बजावुन घेतले. रविवार असल्याने बीचवर खुप गर्दी होती. मी मात्र बऱ्यापैकी मधे जावुन पोहन्याचा आनंद घेतला. दुपारी तीन वाजता पुन्हा अलिबाग बीचवर येवून जेवण केले व परतीचा मार्ग धरला. नाशिक येता येता रात्रीचे 11 वाजले. असा हा आमचा 24 तासाचा ट्रेक तब्बल सव्वा पाचशे किमी आणि कुठेही न झोपता पूर्ण झाला. असा हा अचानक लाभलेला प्रवास अविस्मरणीय राहिल...

दुर्ग पर्यटक- भिमाशंकर सहणे... नाशिक


Friday, 9 November 2018

रायगड



"स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरिल माझा अनुभव"
        प्रथमतः मी बा रायगड परिवाराचे मी आभार मानतो हि अभ्यास मोहीम राबवुन आम्हाला गडाबद्दल आणि छत्रपती श्री शिवरायांबद्दल खुप अनमोल शिकता आले. २७/२८ ऑक्टोबर हे  दोन दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच...

        किल्ले रायगड मोहिम हा माझा २५ वा मोहिम किल्ला... मी याआधी २४ किल्ले पाहिले, अनुभवले पण रायगडा सारखा विलक्षण अनुभव, सखोल इतिहास, स्वराज्य प्रेम, शिव भक्ती, मराठ्यांच्या इतिहास मला या आधी शिकता आला नाही...

        जेष्ठ दुर्गभ्रमणकार, लेखक, दुर्ग अभ्यासक श्री. आनंद पाळंदे, श्री. पांडुरंग बलकवडे,श्री.पराग लिमये सर श्री. संजय करपे आदि अनुभवी वक्तयांची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यांनी पाहिलेला, अभ्यासलेला रायगड आमच्या समोर उभा केला. तसेच वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंद काशीद, स्वराज्यासाठी अटकेपार झेंडा फडकविणारे शूर सरदार वीर  मानाजी पायगुडे यांचे वंशज श्री.राजाभाऊ पायगुडे, सरदार कान्होजी जेधे याचें वंशज श्री. इद्रजितराव जेधे, किल्ले कोंढाण्यावर अनातुलनीय पराक्रम व शौर्य गाजविणार्या  नरवीर तानाजी मालुसूरे यांचे वंशज शितलताई मालूसरे आणि बा रायगड परिवाराचे शिलेदार सागर नलवडे अशा मावळ्यांशी संवाद सादता आला.

"माझा रायगड मोहिम प्रवास"
        मी आणि माझा नाशिकचा मित्र डॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ या रायगड मोहिमेत सहभाग नोंदवला. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आम्ही नाशिक हुन निघालो. नाशिक- कसारा- पनवेल- रायगड असा आमचा प्रवास सुरू झाला. लोकल ट्रेनने पनवेल गाठले, संध्ाकाळचे सात वाजले. पनवेलमध्ये मित्र डॉ. निखिल इंगोले याने सांगितले की आपण पहाटे चार वाजता निघु, मुक्काम त्याचाकडे केला. ठरल्या प्रमाणे पहाटे कारने रायगडच्या दिशेने वाटचाल. रस्ते अनोळखी होते,मोबाईल मध्ये Google map द्वारे रायगड पायथ्याशी पोहचलो.

           सकाळचे ७ वाजले. गाडी पार्क केली आणि बॅगा पाठीवर टाखल्या. टेंट, स्लीपींग बॅग, मॅट, आणि 2 ड्रेस इ. बरोबर घेतलेले. बॅग तर गच्च भरलेली आणि आता गडवाट चालु झाली. आम्ही नाने दरवाजाने निघालो. मी थोडी घाई करत होतो कारण सकाळी ७ वाजता व्याख्यानसत्र सुरू होणार होते. पण मित्र डॉ. इंगोले याचा हा पहिला ट्रेक त्यामुळे थोडी विश्रांती. गड वाटेवर पाणी, लिंबु सरबत, गप्पा आणि जमेल तेथे फोटो. रायगडाचे निसर्ग सौंदर्य अनोखेच. गड वाटेवर अनेक गाढव उतरताना दिसली. मी एका मुलाला विचरले असता कळले कि गड वाटेचे काम चालु आहे म्हणून दगड वाहून नेताय. तब्बल दीड तास चालत होतो. पुढे बुरुज, कडे दिसु लागले. आता थोडे राहीले म्हणत मी मित्रांना दिलासा देत असे.
            थोड्याच वेळात पुढे भव्य दिव्य महादरवाज दिसला..महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. पुढे होउंन मी मित्राला फोटो काढायला सांगीतल. डॉ. गुजळ कडे असलेला Go Pro camera फाटो तसेच मोबाइल मध्ये फोटो टिपत होतो. महादरवाजा जवळील तोफा खुप सुंदर आहेत. हत्ती तलावा बाजुने धर्म शाळेकडे जायचे आणि मग गड फिरायचे ठरले. मी तेथे जाताच विचारले बा रायगड ग्रुप, तेव्हढयात एकजन बा रायगड नावाचा टी शर्ट घेतलेला मुलगा बोलला हो या इकडे... नाव काय? कोटुन आलात? प्रश्न सुरु होते.. मी भिमाशंकर ओळख करून दिली. त्याने बॅगा मधे ठेवायला सांगीतल्या. चक्क १० वाजले होते. नाश्ता आहे का? मी विचारले. एक जन बोलला, कधीच संपला आता जेवनाची तयारी चालु आहे.
आम्ही पाणी आणि थोड़ बॅग मधुन खायला आणि पाणी घेतले आणि ग्रुप कडे निघलो. थोडे चालत जाताच मोठ्या मैदानात श्री शिवरायांचा रुबाबदार पुतळा दिसला. राज्यांचे तिथे पहिले दर्शन झाले नतमस्तक होऊन डोळे भरून हृदयात त्यांना साठवले... पुढे कोणीतरी बोलले की पूर्वेकडे खाली उतरा तिथे वाघ दरवाजा आहे तिकडेच सर्व गेलेत. आम्हाला पुढे जाताच बा रायगड मावळे दिसले. लगोलग त्यांच्या पाठीमागे वाघ दरवाजा गाठला. रस्ता पाउल वाटेचा, उतरनीचा. आम्ही वाघ दरवाजात जमलो. लिमये सरांचे पहिले शब्द तेथेच कानावर पडले.
             बा रायगड शिलेदार सागर नलवडे यांना प्रत्यक्ष कडा चढताना पाहता आले. तब्बल एक तास वाघ दरवाजाची महती अनुभवली.
             वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता.  परतीची वाट
जगदीश्वर मंदिरा कडे. पहिल्या पायरीचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला.
           हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते. मंदिरात बसुन शंभो महादेवाचा जप केला. गाभार्यात बसुन पिंडीचे पुजन केले. पुढे
            जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडला. तीच शिवरायांची समाधी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. तिथे नतमस्तक होऊन दर्शन घेतले, हात जोडले गेले आणि देवा कडे प्राथना केली  "आमच्या राज्यांना परत पाठवा, स्वराज्यात आता त्यांची नितान्त गरज आहे".

          पुढे आम्ही बाजारपेठेच्या वाटेने धर्मशाळेत गेलो. दुपारचे दोन वाजलेले. खुप भुक लागलेली. जेवनाच्या पंगती बसल्या. जेवनात भाजी भात पण इतके सुंदर जेवण कि पोट भरले पण मन भरत नव्हते.
गडावर दोन दिवस जेवलेल्या जेवणाची सर पंचतारांकित हाँटेलच्या जेवणाला पण येणार नाही. जेवणानंतर एका झाडा खाली मस्त झोप घेतली. पुर्ण थकवा निघुन गेला. ४वाजता पुन्हा पुढील अभ्यास मोहिमेस प्रारम्भ. लिमये सरांबरोबर होळीच्या माळ गाठला. तेथुन सर्व शेजारील किल्ले, डोंगर, खिंडी, रानवाटा दाखवल्या. लिंगाना, राजगड, तोरणा किल्ले पुर्वेस दिसत होते आणि इतिहास उलगडला. नंतर शिवाजी महाराज समाधि स्थळ आणि इतिहास अनुभवला. शिलालेख वाचन केले. सर्यास्त कधी झाला कळलेच नाही. समाधि स्थळी २मिनिटे सर्व शांत बसली.
            संध्याकाळी टकमक टोक दुरून पाहिले. हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे २६०० फूट थेट खाली जाणारा कडा आहे. रात्री जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम - मशाल मिरवणूक, गड देवता आई शिर्काई देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम झाला. तो जिवंत सोहळा विसरता येणार नाही, खुप अदभुत,सुंदर. मशालीने रायगड उजळून निघाला. श्री. शिवा काशिद यांचे वंशज आनंद सर यानी सदरे घेतलेले श्लोक ऐकताना अंगावर काटा उभा राहत होता.त्याचा आवाज तर अजून कानात घुमतोय. पुढे गोंधळात मी हि नाचन्या, गान्याचा आनंद घेतला. रात्री शिरकाई देवी मंदिरा माघे झोपलो. पहाटे उठून सूर्योदय बघने हि रायगडावरिल पर्वणी. होळीचा माळ गाठला आणि निखळ सुंदर सर्योदय पाहिला. सह्याद्रिचे सुंदर रूप डोळ्यात साठवले. पुढे चहा नाश्ता अटोपला. स्वारी आता सदरे कडे.
             नगारखाना - राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वेला बसुन आम्ही लिमये सरांकडून इतिहास अनुभवला.
सदरेवर श्री. आनंद काशिद, श्री. पायगुडे सर, माने सर यांनी तत्कालीन शस्र ज्ञान घडवले. पुढे बालेकिल्ला, पालखीची वाट अभ्यासत पुन्हा धर्म शाळेत.
            लिमये सरांचे धन्यवाद कि त्यांच्यामुळे होळीचा माळ - राजसदर - बालेकिल्ला - हिरकणी कडा - गंगासागर तलाव - हत्ती तलाव - हनुमान टाके - बाजारपेठ - टकमक टोक - बारा टाकी - दारुगोळा कोठार - जगदीश्वर मंदिर - शिवसमाधी आणि परिसर स्थळदर्शन व अभ्यास घडुन आला.
           स्वराज्याचे शुर सरदार यांचे वंशज यांचा मानसन्मान,उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार तसेच बा रायगड परिवारातील गुणीजनांचा सत्कार व अभिप्राय आणि आभार मानले गेले. आणि दुपार जेवणानंतर परतीचा प्रवास.

          या मोहिमेत सामिल झालेल्या सर्व मावळे आणि रणरागिणीचे खुप खुप आभार व कवतुक का तर कोणीच कोणाला परकेपणा जानवु दिला नाही. आपण एकच परिवार आहोत यांचा सुखद अनुभव मिळाला.
रायगडाला पुन्हा भेट द्यावी लागणार कारण दोन दिवस राहुनही खुप काही पहायचे राहुन गेले.
खरच "शिवविचार हे अमृतापेक्षा कणभरही कमी नाहीत".

           समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मथुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!

खुप काही अनुभवले पण सर्व असे शब्दात सांगणे कठिण.

धन्यवाद- भिमाशंकर सहणे..नाशिक

Thursday, 28 June 2018

Why Do People Go for Treks?

*Why people go for trekking*

"So why do people go for treks?"
Why do they risk their lives to conquer an unseen mountain?
Just for the sake of victory?
               Those are hardly the reasons. Treks transform you. You come to know yourself but not by looking within, it is by loosing yourself. On a trek you hardly remember who you are. You hardly remember what you do in the city for a living. You for some time let go of all the people associated with you. The mountain does not care whether you are a CEO of a multinational or a local sherpa. After walking for sometime in nature you loose your identity and become one with the mountains. Somehow nothing else matters, your work, your relationships, nothing. All that matters is the next step. It could give you a firm footing and confidence to move ahead or it can lead you to a fifty foot fall. In that decisive moment you are alive. More alive than ever. That’s when you completely lose yourself and realize who you truly are. Each moment reveals newer potentials. You swim across unknown waters of your soul.                                Through falling you realize that you have the strength to get up. Through bruising you realize that you have the power to be healed. Through being alone you realize your own freedom. In the everyday routine of life, all of us forget who we truly are. In fact being on a trek is one of the very few times when we actually remember!"
-Bhimashankar Sahane. (Nature lovers Treker)
*Be Healthy & Keep safe Trekking*
Moderator of My Nashik Trekking Group