Sunday, 25 November 2018


"Kolaba Fort"


"किल्ले कुलाबा , मराठ्यांची सागरी राजधानी !"


          कुलाबा किल्ला बघायचे असे काही पूर्व नियोजन नव्हते... खरेतर आम्ही अचानक मुरुड जंजीर बघायाचा आणि अलिबाग किंवा काशीद बीच असे नियोजन. पण वेळे अभावी मुरुड जंजीरा न करता अलिबाग बीच आणि नागांव बीच करायचे ठरले तेही अलिबागला गेल्यावर.
           शनिवारी रात्री मित्राचा कॉल अला कि असे नियोजन आहे चल. मी दहा मिनिटात तयार झालो. बॅग हि नाही घेतली कारण लगेच परत यायचे होते. नाशिकहुन रात्री 12:30 वाजता निघालो. आम्ही चौघे मित्र मी, आशिष, आदित्य आणि विलास सर्व नाशिकचे कारने प्रवास आणि दोघांना गाडी चालवता येत होती त्यामुळे परत येणे शक्य होते पण पनवेलच्या पुढे रस्ता दुर्दशेत. त्यामुळे ट्रेक अटोपता घ्यावा लागला. नेहमी प्रमाणे गूगल map ने खुप मदत केली. अलिबाग बीचला पोहचलो तेंव्हा सकाळचे सात वाजले होते. एका हॉटेलमधे जेवण केले होते. अलिबाग चा नेहमी प्रमाणे गजबजलेला बीच सकाळी मात्र मोकळा होता. एक तास तेथे घालवला. तेथुन पुढचे नियोजन नागांव बीच पण जाताना आम्हाला एक किल्ला दिसला विचारले असता कळले कि तो कुलाबा किल्ला आहे. मग कुलाबा आणि मग नागांव बीच असे नियोजन ठरले.
            अर्ध्या तासात कुलाबा बीच वर पोहचलो. गाडी पार्क केली आणि तेथे एका छोट्या होटलमधे नाश्ता केला. बीचवरुन 200 रु. टिकेट काढले आणि बोटिने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्याहुन १ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याहुन ओहोटी वेळेस किल्ल्यात चालत जाता येते तर भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते.येथे किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाचे 25 रु. तिकीट घ्यावे लागते.

कुलाबा किल्ला:
              मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला उभा आहे. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला दिसून येतो. कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आला तो सरखेल कान्होजी आंग्रेच्या काळात. नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची अशा यथार्थ शब्दांनी गौरविलेल्या कान्होजीं आंग्रेनी आपले प्रमुख ठाणे म्हणून कुलाबा किल्ल्याची निवड केली. प्रथम शिवशाही नंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
               दक्षिणोत्तर पसरलेला हा लांबट चौकोनी आकाराचा हा जलदुर्ग ज्या खडकावर उभा आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी ९०० फूट असून पूर्व पश्चिम रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३३५ वर्षे उलटली तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता खंबीरपणे उभा आहे.

 कुलाबा किल्ल्याला पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने अशी दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात तरीही मुख्य प्रवेशव्दारापासून सुमारे १५ फूटापर्यंत भरतीचे पाणी येत नाही. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर खाचा मारून रचलेले आहेत. दोन दगडांतील फटीत चुना भरलेला नसल्याने समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेचा जोर कमी होतो. किनाऱ्याहुन येताना किल्ल्याचा मुख्य दरवाजा सरळ समोर दिसत नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजुस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. थोडे उजव्या हाताला वळल्यावर दोन मोठया बुरुजांच्या मध्ये त्याचे दर्शन होते. दोन बुरुजांच्या मधोमधील महाद्वारावर नगारखाना असुन या दरवाज्यावर मोर, हत्ती, हरिण, शरभ आदी पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय उमलत्या कमळांची अनेक फुले कोरलेली असुन कमानीच्या मध्यभागी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. आत शिरताच वळण घेत पुढे आणखी एक दरवाजा आहे. हा किल्ल्याचा दरवाज्यातील रणमंडळाचा भाग आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा केवळ अवशेष रुपात शिल्लक असुन या दरवाजातून आंत जाताना कोनाड्यातील देवतांचे दर्शन होते.

किल्ल्याला एकुण १७ बुरुज असुन चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे त्यांची रचना आहे. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी,फत्तेबुरुज, दर्याबुरुज अशी नावे आहेत. शिरल्यावर उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते.

गडात शिरल्यावर समोर गुलवती देवीची घुमटी तर तटाकडे गडदेवता भवानीदेवी मंदिर दिसते. गडदेवता भवानी देवीच्या मंदिरात गणेश आणि वेताळ यांच्याही मुर्ती आहेत. देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभ आहे. लागुनच दहाबारा घरांची वस्ती आहे. या तटाच्या वर बुरूजावर दोन मध्यम आकाराच्या तोफा मातीत पडल्या आहेत. येथुन खाली उतरून आल्यावाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजूला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.
              देवीच्या मंदिरांपासुन सरळ निघालेल्या या वाटेत एक सिध्दीविनायक मंदिर आहे. छोटयाशा दगडी तटाच्या आत हे मंदिर असुन मंदिराच्या आवारात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा समोर एक अतिशय बारीक नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन आहे. साधारण वीस मीटर लांब, सहा मीटर रुंद व पंधरा मीटर उंच अशा ह्या मंदिराचे निर्माण राघोजी आंग्रेने सन १७५९ मध्ये केले. मुख्य मंदिर हेमाडपंती असुन मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले भग्न झालेले कारंजे आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची दीडफुट उंच मुर्तीची स्थापना केलेली आहे.

              मंदीरा बाहेर काळ्या दगडातील जुनी बांधकामातील नक्षीदार २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिरासमोरच एक चिरेबंदी बांधणीची गोडया पाण्याची देखणी पुष्कर्णी आहे. ३४.५ मीटर लांब आणि ३१.५ मीटर रुंद अशा विस्तीर्ण आकारातील हा तलाव राघोजी आंग्य्रांनीच बांधला. भिंतीला लागुनच बापदेवाची घुमटी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटाबाहेर स्वच्छ पाण्याची विहीर असुन या विहिरीला आत उतरायला पायऱ्या आहेत. याशिवाय गडातील पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता दक्षिणेकडे अंधारबाव नावाची आणखी एक विहीर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर ओंजळीने या विहिरीचे पाणी पिता येते.
 उत्तर बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ डाऊसन हार्डीफिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर इंग्लंड, १८४९असे तोफा बनवणाऱ्या कंपनीच नाव व वर्ष कोरलेल आहे. उत्तरेकडील या बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्लादर्शन होते तर पूर्वेला सागरगड व कणकेश्वर डोंगर दिसतो.दक्षिणेकडे कोर्लई किल्लाही दिसतो. मुख्य प्रवेशदार व विनायकाचे मंदिर ह्यामधे कान्होजी आंग्य्रांच्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात.
             सन १८१६मधे नानीसाहेबाचा वाडा नावाची पाच मजली इमारत राघोजी आंग्रे यांनी नव्याने बांधली आणि राहती केला. पण थोडय़ाच वर्षांत १८३९ मध्ये आंग्य्रांचे हे संस्थान इंग्रजांकडून खालसा झाले. त्यांचा अंमल आल्यावर त्यांनी सन १८४२ मधे या वाडय़ाच्या लाकडांचा लिलाव केला आणि इथले दगड वापरुन अलिबागच्या पाणी पुरवठा विभागाची इमारत बांधली. कुलाबा हे नाव 'कुल' आणि 'आप' या शब्दांपासून तयार झाले. कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी ! सर्व (बाजूने) पाणी असलेली ही जागा म्हणजे 'कुलाप'! याचाच अपभ्रंश तो कुलाबा ! इतिहासकाराच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले अशी माहिती मिळते म्हणजेच छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग! अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटर आत असलेल्या खडकावर १२ मार्च १६८० ते जुन १६८१पर्यंत भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याची येथे चौकी होती. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र ह्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर नवीन किल्ले बांधले व जुने अधिक बळकट केले. २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले.

          महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीस आला. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून त्यांनी आपले आरमार कुलाबा किल्ल्यावर हलवले आणि हा किल्ला आरमारी डावपेचांचा केंद्र बनला. जंजिऱ्याच्या सिद्दीने अनेक वेळा कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला पण प्रत्येक वेळी त्याला पराभव झाला. या किल्ल्याजवळ समुद्र खडकाळ व उथळ असून बंदरांत येण्याचा मार्ग अरुंद व सांपडण्यास कठिण असल्यामुळे आंग्र्यांचे आरमार या बंदरांत सुरक्षित असे. डच,इंग्रज, पोर्तुगीज आणि मुरुडचा सिद्दी या परकीय संकटांना आंग्य्रांच्या या अभेद्य भिंतीने रोखून धरले.

            कुलाबकर आंग्य्रांच्या पाच पिढय़ा इथे नांदल्या. त्यामुळे कुलाब्याच्या साऱ्या इतिहासावर आंग्रे घराण्याची छाप पडलेली आहे. ४ जुलै १७२९रोजी सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यात निधन झाले. त्यांची समाधी आजही आपल्याला अलिबाग मधील ठुकराली नाका येथे बघायला मिळते. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. कान्होजी आंग्रे यांनी योग्य रणनीती आखुन बाजीराव पेशव्यांच्या सहाय्याने या संयुक्त फौजेचा पराभव केला.
              असा हा सुंदर इतिहास असलेला कुलाबा किल्ला अलिबागला गेल्यावर नक्की बघा.
              वेळे अभावी आम्ही किल्ल्यातुन लवकरच निघालो. पुढे नागांव बीचला जावुन बोट राइडिंग केले. बनाना राइडिंग करताना तर तर बोट पाण्यात पलटी करायची तरच पैसे देवु असे बजावुन घेतले. रविवार असल्याने बीचवर खुप गर्दी होती. मी मात्र बऱ्यापैकी मधे जावुन पोहन्याचा आनंद घेतला. दुपारी तीन वाजता पुन्हा अलिबाग बीचवर येवून जेवण केले व परतीचा मार्ग धरला. नाशिक येता येता रात्रीचे 11 वाजले. असा हा आमचा 24 तासाचा ट्रेक तब्बल सव्वा पाचशे किमी आणि कुठेही न झोपता पूर्ण झाला. असा हा अचानक लाभलेला प्रवास अविस्मरणीय राहिल...

दुर्ग पर्यटक- भिमाशंकर सहणे... नाशिक


Friday, 9 November 2018

रायगड



"स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरिल माझा अनुभव"
        प्रथमतः मी बा रायगड परिवाराचे मी आभार मानतो हि अभ्यास मोहीम राबवुन आम्हाला गडाबद्दल आणि छत्रपती श्री शिवरायांबद्दल खुप अनमोल शिकता आले. २७/२८ ऑक्टोबर हे  दोन दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच...

        किल्ले रायगड मोहिम हा माझा २५ वा मोहिम किल्ला... मी याआधी २४ किल्ले पाहिले, अनुभवले पण रायगडा सारखा विलक्षण अनुभव, सखोल इतिहास, स्वराज्य प्रेम, शिव भक्ती, मराठ्यांच्या इतिहास मला या आधी शिकता आला नाही...

        जेष्ठ दुर्गभ्रमणकार, लेखक, दुर्ग अभ्यासक श्री. आनंद पाळंदे, श्री. पांडुरंग बलकवडे,श्री.पराग लिमये सर श्री. संजय करपे आदि अनुभवी वक्तयांची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यांनी पाहिलेला, अभ्यासलेला रायगड आमच्या समोर उभा केला. तसेच वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंद काशीद, स्वराज्यासाठी अटकेपार झेंडा फडकविणारे शूर सरदार वीर  मानाजी पायगुडे यांचे वंशज श्री.राजाभाऊ पायगुडे, सरदार कान्होजी जेधे याचें वंशज श्री. इद्रजितराव जेधे, किल्ले कोंढाण्यावर अनातुलनीय पराक्रम व शौर्य गाजविणार्या  नरवीर तानाजी मालुसूरे यांचे वंशज शितलताई मालूसरे आणि बा रायगड परिवाराचे शिलेदार सागर नलवडे अशा मावळ्यांशी संवाद सादता आला.

"माझा रायगड मोहिम प्रवास"
        मी आणि माझा नाशिकचा मित्र डॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ या रायगड मोहिमेत सहभाग नोंदवला. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आम्ही नाशिक हुन निघालो. नाशिक- कसारा- पनवेल- रायगड असा आमचा प्रवास सुरू झाला. लोकल ट्रेनने पनवेल गाठले, संध्ाकाळचे सात वाजले. पनवेलमध्ये मित्र डॉ. निखिल इंगोले याने सांगितले की आपण पहाटे चार वाजता निघु, मुक्काम त्याचाकडे केला. ठरल्या प्रमाणे पहाटे कारने रायगडच्या दिशेने वाटचाल. रस्ते अनोळखी होते,मोबाईल मध्ये Google map द्वारे रायगड पायथ्याशी पोहचलो.

           सकाळचे ७ वाजले. गाडी पार्क केली आणि बॅगा पाठीवर टाखल्या. टेंट, स्लीपींग बॅग, मॅट, आणि 2 ड्रेस इ. बरोबर घेतलेले. बॅग तर गच्च भरलेली आणि आता गडवाट चालु झाली. आम्ही नाने दरवाजाने निघालो. मी थोडी घाई करत होतो कारण सकाळी ७ वाजता व्याख्यानसत्र सुरू होणार होते. पण मित्र डॉ. इंगोले याचा हा पहिला ट्रेक त्यामुळे थोडी विश्रांती. गड वाटेवर पाणी, लिंबु सरबत, गप्पा आणि जमेल तेथे फोटो. रायगडाचे निसर्ग सौंदर्य अनोखेच. गड वाटेवर अनेक गाढव उतरताना दिसली. मी एका मुलाला विचरले असता कळले कि गड वाटेचे काम चालु आहे म्हणून दगड वाहून नेताय. तब्बल दीड तास चालत होतो. पुढे बुरुज, कडे दिसु लागले. आता थोडे राहीले म्हणत मी मित्रांना दिलासा देत असे.
            थोड्याच वेळात पुढे भव्य दिव्य महादरवाज दिसला..महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. पुढे होउंन मी मित्राला फोटो काढायला सांगीतल. डॉ. गुजळ कडे असलेला Go Pro camera फाटो तसेच मोबाइल मध्ये फोटो टिपत होतो. महादरवाजा जवळील तोफा खुप सुंदर आहेत. हत्ती तलावा बाजुने धर्म शाळेकडे जायचे आणि मग गड फिरायचे ठरले. मी तेथे जाताच विचारले बा रायगड ग्रुप, तेव्हढयात एकजन बा रायगड नावाचा टी शर्ट घेतलेला मुलगा बोलला हो या इकडे... नाव काय? कोटुन आलात? प्रश्न सुरु होते.. मी भिमाशंकर ओळख करून दिली. त्याने बॅगा मधे ठेवायला सांगीतल्या. चक्क १० वाजले होते. नाश्ता आहे का? मी विचारले. एक जन बोलला, कधीच संपला आता जेवनाची तयारी चालु आहे.
आम्ही पाणी आणि थोड़ बॅग मधुन खायला आणि पाणी घेतले आणि ग्रुप कडे निघलो. थोडे चालत जाताच मोठ्या मैदानात श्री शिवरायांचा रुबाबदार पुतळा दिसला. राज्यांचे तिथे पहिले दर्शन झाले नतमस्तक होऊन डोळे भरून हृदयात त्यांना साठवले... पुढे कोणीतरी बोलले की पूर्वेकडे खाली उतरा तिथे वाघ दरवाजा आहे तिकडेच सर्व गेलेत. आम्हाला पुढे जाताच बा रायगड मावळे दिसले. लगोलग त्यांच्या पाठीमागे वाघ दरवाजा गाठला. रस्ता पाउल वाटेचा, उतरनीचा. आम्ही वाघ दरवाजात जमलो. लिमये सरांचे पहिले शब्द तेथेच कानावर पडले.
             बा रायगड शिलेदार सागर नलवडे यांना प्रत्यक्ष कडा चढताना पाहता आले. तब्बल एक तास वाघ दरवाजाची महती अनुभवली.
             वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता.  परतीची वाट
जगदीश्वर मंदिरा कडे. पहिल्या पायरीचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला.
           हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते. मंदिरात बसुन शंभो महादेवाचा जप केला. गाभार्यात बसुन पिंडीचे पुजन केले. पुढे
            जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडला. तीच शिवरायांची समाधी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. तिथे नतमस्तक होऊन दर्शन घेतले, हात जोडले गेले आणि देवा कडे प्राथना केली  "आमच्या राज्यांना परत पाठवा, स्वराज्यात आता त्यांची नितान्त गरज आहे".

          पुढे आम्ही बाजारपेठेच्या वाटेने धर्मशाळेत गेलो. दुपारचे दोन वाजलेले. खुप भुक लागलेली. जेवनाच्या पंगती बसल्या. जेवनात भाजी भात पण इतके सुंदर जेवण कि पोट भरले पण मन भरत नव्हते.
गडावर दोन दिवस जेवलेल्या जेवणाची सर पंचतारांकित हाँटेलच्या जेवणाला पण येणार नाही. जेवणानंतर एका झाडा खाली मस्त झोप घेतली. पुर्ण थकवा निघुन गेला. ४वाजता पुन्हा पुढील अभ्यास मोहिमेस प्रारम्भ. लिमये सरांबरोबर होळीच्या माळ गाठला. तेथुन सर्व शेजारील किल्ले, डोंगर, खिंडी, रानवाटा दाखवल्या. लिंगाना, राजगड, तोरणा किल्ले पुर्वेस दिसत होते आणि इतिहास उलगडला. नंतर शिवाजी महाराज समाधि स्थळ आणि इतिहास अनुभवला. शिलालेख वाचन केले. सर्यास्त कधी झाला कळलेच नाही. समाधि स्थळी २मिनिटे सर्व शांत बसली.
            संध्याकाळी टकमक टोक दुरून पाहिले. हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे २६०० फूट थेट खाली जाणारा कडा आहे. रात्री जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम - मशाल मिरवणूक, गड देवता आई शिर्काई देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम झाला. तो जिवंत सोहळा विसरता येणार नाही, खुप अदभुत,सुंदर. मशालीने रायगड उजळून निघाला. श्री. शिवा काशिद यांचे वंशज आनंद सर यानी सदरे घेतलेले श्लोक ऐकताना अंगावर काटा उभा राहत होता.त्याचा आवाज तर अजून कानात घुमतोय. पुढे गोंधळात मी हि नाचन्या, गान्याचा आनंद घेतला. रात्री शिरकाई देवी मंदिरा माघे झोपलो. पहाटे उठून सूर्योदय बघने हि रायगडावरिल पर्वणी. होळीचा माळ गाठला आणि निखळ सुंदर सर्योदय पाहिला. सह्याद्रिचे सुंदर रूप डोळ्यात साठवले. पुढे चहा नाश्ता अटोपला. स्वारी आता सदरे कडे.
             नगारखाना - राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वेला बसुन आम्ही लिमये सरांकडून इतिहास अनुभवला.
सदरेवर श्री. आनंद काशिद, श्री. पायगुडे सर, माने सर यांनी तत्कालीन शस्र ज्ञान घडवले. पुढे बालेकिल्ला, पालखीची वाट अभ्यासत पुन्हा धर्म शाळेत.
            लिमये सरांचे धन्यवाद कि त्यांच्यामुळे होळीचा माळ - राजसदर - बालेकिल्ला - हिरकणी कडा - गंगासागर तलाव - हत्ती तलाव - हनुमान टाके - बाजारपेठ - टकमक टोक - बारा टाकी - दारुगोळा कोठार - जगदीश्वर मंदिर - शिवसमाधी आणि परिसर स्थळदर्शन व अभ्यास घडुन आला.
           स्वराज्याचे शुर सरदार यांचे वंशज यांचा मानसन्मान,उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार तसेच बा रायगड परिवारातील गुणीजनांचा सत्कार व अभिप्राय आणि आभार मानले गेले. आणि दुपार जेवणानंतर परतीचा प्रवास.

          या मोहिमेत सामिल झालेल्या सर्व मावळे आणि रणरागिणीचे खुप खुप आभार व कवतुक का तर कोणीच कोणाला परकेपणा जानवु दिला नाही. आपण एकच परिवार आहोत यांचा सुखद अनुभव मिळाला.
रायगडाला पुन्हा भेट द्यावी लागणार कारण दोन दिवस राहुनही खुप काही पहायचे राहुन गेले.
खरच "शिवविचार हे अमृतापेक्षा कणभरही कमी नाहीत".

           समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मथुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!

खुप काही अनुभवले पण सर्व असे शब्दात सांगणे कठिण.

धन्यवाद- भिमाशंकर सहणे..नाशिक