Friday, 9 November 2018

रायगड



"स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरिल माझा अनुभव"
        प्रथमतः मी बा रायगड परिवाराचे मी आभार मानतो हि अभ्यास मोहीम राबवुन आम्हाला गडाबद्दल आणि छत्रपती श्री शिवरायांबद्दल खुप अनमोल शिकता आले. २७/२८ ऑक्टोबर हे  दोन दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच...

        किल्ले रायगड मोहिम हा माझा २५ वा मोहिम किल्ला... मी याआधी २४ किल्ले पाहिले, अनुभवले पण रायगडा सारखा विलक्षण अनुभव, सखोल इतिहास, स्वराज्य प्रेम, शिव भक्ती, मराठ्यांच्या इतिहास मला या आधी शिकता आला नाही...

        जेष्ठ दुर्गभ्रमणकार, लेखक, दुर्ग अभ्यासक श्री. आनंद पाळंदे, श्री. पांडुरंग बलकवडे,श्री.पराग लिमये सर श्री. संजय करपे आदि अनुभवी वक्तयांची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यांनी पाहिलेला, अभ्यासलेला रायगड आमच्या समोर उभा केला. तसेच वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंद काशीद, स्वराज्यासाठी अटकेपार झेंडा फडकविणारे शूर सरदार वीर  मानाजी पायगुडे यांचे वंशज श्री.राजाभाऊ पायगुडे, सरदार कान्होजी जेधे याचें वंशज श्री. इद्रजितराव जेधे, किल्ले कोंढाण्यावर अनातुलनीय पराक्रम व शौर्य गाजविणार्या  नरवीर तानाजी मालुसूरे यांचे वंशज शितलताई मालूसरे आणि बा रायगड परिवाराचे शिलेदार सागर नलवडे अशा मावळ्यांशी संवाद सादता आला.

"माझा रायगड मोहिम प्रवास"
        मी आणि माझा नाशिकचा मित्र डॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ या रायगड मोहिमेत सहभाग नोंदवला. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आम्ही नाशिक हुन निघालो. नाशिक- कसारा- पनवेल- रायगड असा आमचा प्रवास सुरू झाला. लोकल ट्रेनने पनवेल गाठले, संध्ाकाळचे सात वाजले. पनवेलमध्ये मित्र डॉ. निखिल इंगोले याने सांगितले की आपण पहाटे चार वाजता निघु, मुक्काम त्याचाकडे केला. ठरल्या प्रमाणे पहाटे कारने रायगडच्या दिशेने वाटचाल. रस्ते अनोळखी होते,मोबाईल मध्ये Google map द्वारे रायगड पायथ्याशी पोहचलो.

           सकाळचे ७ वाजले. गाडी पार्क केली आणि बॅगा पाठीवर टाखल्या. टेंट, स्लीपींग बॅग, मॅट, आणि 2 ड्रेस इ. बरोबर घेतलेले. बॅग तर गच्च भरलेली आणि आता गडवाट चालु झाली. आम्ही नाने दरवाजाने निघालो. मी थोडी घाई करत होतो कारण सकाळी ७ वाजता व्याख्यानसत्र सुरू होणार होते. पण मित्र डॉ. इंगोले याचा हा पहिला ट्रेक त्यामुळे थोडी विश्रांती. गड वाटेवर पाणी, लिंबु सरबत, गप्पा आणि जमेल तेथे फोटो. रायगडाचे निसर्ग सौंदर्य अनोखेच. गड वाटेवर अनेक गाढव उतरताना दिसली. मी एका मुलाला विचरले असता कळले कि गड वाटेचे काम चालु आहे म्हणून दगड वाहून नेताय. तब्बल दीड तास चालत होतो. पुढे बुरुज, कडे दिसु लागले. आता थोडे राहीले म्हणत मी मित्रांना दिलासा देत असे.
            थोड्याच वेळात पुढे भव्य दिव्य महादरवाज दिसला..महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. पुढे होउंन मी मित्राला फोटो काढायला सांगीतल. डॉ. गुजळ कडे असलेला Go Pro camera फाटो तसेच मोबाइल मध्ये फोटो टिपत होतो. महादरवाजा जवळील तोफा खुप सुंदर आहेत. हत्ती तलावा बाजुने धर्म शाळेकडे जायचे आणि मग गड फिरायचे ठरले. मी तेथे जाताच विचारले बा रायगड ग्रुप, तेव्हढयात एकजन बा रायगड नावाचा टी शर्ट घेतलेला मुलगा बोलला हो या इकडे... नाव काय? कोटुन आलात? प्रश्न सुरु होते.. मी भिमाशंकर ओळख करून दिली. त्याने बॅगा मधे ठेवायला सांगीतल्या. चक्क १० वाजले होते. नाश्ता आहे का? मी विचारले. एक जन बोलला, कधीच संपला आता जेवनाची तयारी चालु आहे.
आम्ही पाणी आणि थोड़ बॅग मधुन खायला आणि पाणी घेतले आणि ग्रुप कडे निघलो. थोडे चालत जाताच मोठ्या मैदानात श्री शिवरायांचा रुबाबदार पुतळा दिसला. राज्यांचे तिथे पहिले दर्शन झाले नतमस्तक होऊन डोळे भरून हृदयात त्यांना साठवले... पुढे कोणीतरी बोलले की पूर्वेकडे खाली उतरा तिथे वाघ दरवाजा आहे तिकडेच सर्व गेलेत. आम्हाला पुढे जाताच बा रायगड मावळे दिसले. लगोलग त्यांच्या पाठीमागे वाघ दरवाजा गाठला. रस्ता पाउल वाटेचा, उतरनीचा. आम्ही वाघ दरवाजात जमलो. लिमये सरांचे पहिले शब्द तेथेच कानावर पडले.
             बा रायगड शिलेदार सागर नलवडे यांना प्रत्यक्ष कडा चढताना पाहता आले. तब्बल एक तास वाघ दरवाजाची महती अनुभवली.
             वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता.  परतीची वाट
जगदीश्वर मंदिरा कडे. पहिल्या पायरीचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला.
           हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते. मंदिरात बसुन शंभो महादेवाचा जप केला. गाभार्यात बसुन पिंडीचे पुजन केले. पुढे
            जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडला. तीच शिवरायांची समाधी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. तिथे नतमस्तक होऊन दर्शन घेतले, हात जोडले गेले आणि देवा कडे प्राथना केली  "आमच्या राज्यांना परत पाठवा, स्वराज्यात आता त्यांची नितान्त गरज आहे".

          पुढे आम्ही बाजारपेठेच्या वाटेने धर्मशाळेत गेलो. दुपारचे दोन वाजलेले. खुप भुक लागलेली. जेवनाच्या पंगती बसल्या. जेवनात भाजी भात पण इतके सुंदर जेवण कि पोट भरले पण मन भरत नव्हते.
गडावर दोन दिवस जेवलेल्या जेवणाची सर पंचतारांकित हाँटेलच्या जेवणाला पण येणार नाही. जेवणानंतर एका झाडा खाली मस्त झोप घेतली. पुर्ण थकवा निघुन गेला. ४वाजता पुन्हा पुढील अभ्यास मोहिमेस प्रारम्भ. लिमये सरांबरोबर होळीच्या माळ गाठला. तेथुन सर्व शेजारील किल्ले, डोंगर, खिंडी, रानवाटा दाखवल्या. लिंगाना, राजगड, तोरणा किल्ले पुर्वेस दिसत होते आणि इतिहास उलगडला. नंतर शिवाजी महाराज समाधि स्थळ आणि इतिहास अनुभवला. शिलालेख वाचन केले. सर्यास्त कधी झाला कळलेच नाही. समाधि स्थळी २मिनिटे सर्व शांत बसली.
            संध्याकाळी टकमक टोक दुरून पाहिले. हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे २६०० फूट थेट खाली जाणारा कडा आहे. रात्री जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम - मशाल मिरवणूक, गड देवता आई शिर्काई देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम झाला. तो जिवंत सोहळा विसरता येणार नाही, खुप अदभुत,सुंदर. मशालीने रायगड उजळून निघाला. श्री. शिवा काशिद यांचे वंशज आनंद सर यानी सदरे घेतलेले श्लोक ऐकताना अंगावर काटा उभा राहत होता.त्याचा आवाज तर अजून कानात घुमतोय. पुढे गोंधळात मी हि नाचन्या, गान्याचा आनंद घेतला. रात्री शिरकाई देवी मंदिरा माघे झोपलो. पहाटे उठून सूर्योदय बघने हि रायगडावरिल पर्वणी. होळीचा माळ गाठला आणि निखळ सुंदर सर्योदय पाहिला. सह्याद्रिचे सुंदर रूप डोळ्यात साठवले. पुढे चहा नाश्ता अटोपला. स्वारी आता सदरे कडे.
             नगारखाना - राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वेला बसुन आम्ही लिमये सरांकडून इतिहास अनुभवला.
सदरेवर श्री. आनंद काशिद, श्री. पायगुडे सर, माने सर यांनी तत्कालीन शस्र ज्ञान घडवले. पुढे बालेकिल्ला, पालखीची वाट अभ्यासत पुन्हा धर्म शाळेत.
            लिमये सरांचे धन्यवाद कि त्यांच्यामुळे होळीचा माळ - राजसदर - बालेकिल्ला - हिरकणी कडा - गंगासागर तलाव - हत्ती तलाव - हनुमान टाके - बाजारपेठ - टकमक टोक - बारा टाकी - दारुगोळा कोठार - जगदीश्वर मंदिर - शिवसमाधी आणि परिसर स्थळदर्शन व अभ्यास घडुन आला.
           स्वराज्याचे शुर सरदार यांचे वंशज यांचा मानसन्मान,उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार तसेच बा रायगड परिवारातील गुणीजनांचा सत्कार व अभिप्राय आणि आभार मानले गेले. आणि दुपार जेवणानंतर परतीचा प्रवास.

          या मोहिमेत सामिल झालेल्या सर्व मावळे आणि रणरागिणीचे खुप खुप आभार व कवतुक का तर कोणीच कोणाला परकेपणा जानवु दिला नाही. आपण एकच परिवार आहोत यांचा सुखद अनुभव मिळाला.
रायगडाला पुन्हा भेट द्यावी लागणार कारण दोन दिवस राहुनही खुप काही पहायचे राहुन गेले.
खरच "शिवविचार हे अमृतापेक्षा कणभरही कमी नाहीत".

           समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मथुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!

खुप काही अनुभवले पण सर्व असे शब्दात सांगणे कठिण.

धन्यवाद- भिमाशंकर सहणे..नाशिक

No comments:

Post a Comment