हेमाडपंथी जगदंबा मंदिर : टाहाकारी, अकोले
पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे.
राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर पाहन्यासारखे आहे. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
आढळा नदीवरील टाहाकारी मंदिर तीन पांढरे कळस असलेले आणि मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे - टाकेद गाव - टाहाकारी
२) नाशिक सिन्नर- ठाणगांव - टाहाकारी
३) नाशिक सिन्नर - डुबेर - पाडळी - समशेरपुर फाटा - टाहाकारी






No comments:
Post a Comment